सिंधुदुर्गासह ठाणे, मुंबईत उच्च लाटांचा इशारा

सिंधुदुर्गासह ठाणे, मुंबईत उच्च लाटांचा इशारा

 

सिंधुदुर्गनगरी


 

     सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आदी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असून त्यात असे म्हटले आहे की, या जिल्ह्यांच्या सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री ११.३० वाजेपर्यंत ३.५ ते ३.८ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी विशेषतः खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला असून मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये. तसेच किनारपट्टीजवळील पर्यटन आणि जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे आणि अनावश्यक गर्दी करू नये, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.