सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची संगणकीकरणात आघाडी; राज्यात अव्वल कामगिरी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची संगणकीकरणात आघाडी; राज्यात अव्वल कामगिरी

सिंधुदुर्गनगरी

 

    सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत कार्यरत प्राथमिक सेवा सहकारी संस्थांनी संगणकीकरण प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाचा आदर्श निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने आणि नाबार्डने संगणकीकरण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१४ संस्थाना ई- पीएसीएस म्हणून घोषित केले आहे. परिणामी राज्यातील ३३च जिल्हा बँकांत सिंधुदुर्ग जिल्हा बँक डायनामिक डे-एंड असणारी बँक म्हणून अव्वल ठरली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २२७ पैकी २१४ प्राथमिक संस्था संगणकीकरणाच्या पहिल्या टप्प्यात असून, त्यापैकी सर्व २१४ संस्था ERP प्रणालीवर कार्यरत झाल्या आहेत. तसेच एच्ओसी चे कामही १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय, २१३ संस्थांमध्ये डायनामिक डे-एंड प्रक्रिया यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने आणि नाबार्डने संगणकीकरण योजनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व २१४ संस्थाना E-PACS म्हणून घोषित केलेले आहे.या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महाराष्ट्र राज्यातील ३३ मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक डायनामिक डे-एंड असणारी बँक म्हणून ९.९९ स्कोअर नोंदवून अव्वल स्थान पटकावले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज सुरु असून, संस्थांच्या सचिवांना यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले आहे. संगणकीकरणामुळे संस्थांचा कारभार अधिक गतिमान, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनत चालला आहे. या उपक्रमामुळे सहकार क्षेत्रात डिजिटल परिवर्तन घडून येत असून ग्रामीण भागातील शेतकरी व सभासदांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. संगणकीकरणामुळे संस्थांच्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता वाढली असून, कर्ज वितरण, वसुली, ठेवी व लेखा व्यवस्थापन अधिक जलद आणि अचूक झाले आहे. तसेच सभासदांना त्यांच्या खात्याची माहिती तत्काळ उपलब्ध होत असल्याने बँकेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. या यशामागे बँकेचे नोडल अधिकारी वसंत हडकर, त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच संस्थांचे सचिव, एस आय टीमचे प्रमुख महेश पारधी व सहकारी, सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक बाळ परब व त्यांचे सहकारी, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दिपाली माळी, आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्व टीमला बँकेच्या संचालक मंडळाने दिलेली साथ यांचे समन्वयित आणि नियोजनबद्ध प्रयत्न कारणीभूत ठरले असून, सहकार क्षेत्रात डिजिटल क्रांतीची ही वाटचाल पुढील काळात अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला आहे.