वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात तातडीच्या बैठकीचे आयोजन

वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासनाच्या बेजबाबदार आणि अनागोंदी कारभाराविरोधात शहरातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक उद्या सायंकाळी ५ वाजता वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात होणार आहे. शहरातील गटारे, नाले आणि रस्ते अनेक ठिकाणी उखडून आणि फोडून टाकल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या या नगरपरिषदेवर डिसेंबर २०२१ पासून प्रशासक नियुक्त आहेत. पावसाळ्यापूर्वी कामांची वर्क ऑर्डर असताना देखील पावसाच्या तोंडावरच या कामांना सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या सर्व प्रकारांना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि बांधकाम अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या गंभीर परिस्थितीवर आवाज उठवण्यासाठी शहरातील पीडित आणि प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, सर्वपक्षीय पदाधिकारी व सदस्य, माजी नगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहून आपल्या समस्या व विचार व्यक्त करावेत, असे आवाहन रूपाली पाटील, ॲड. मनिष सातार्डेकर, ॲड. नंदन वेंगुर्लेकर आणि इतर जागरूक नागरिकांनी केले आहे.