उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ एप्रिलला सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कुडाळ
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर जिल्ह्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २४ तारखेला सिंधुदुर्गात येत आहेत. सायंकाळी ४ वाजता त्यांची कुडाळ एसटी डेपो मैदानावर जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली. दरम्यान या सभेच्या ठिकाणी ठाकरे गटाचे अनेक सरपंच व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र महायुती असल्यामुळे एकमेकांच्या पक्षातून कोणीही प्रवेश करणार नाही, असे यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उप जिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, संजय पडते, नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, तालुका प्रमुख अरविंद करलकर, प्रवक्ते रत्नाकर जोशी, दादा साईल, देवेंद्र नाईक आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. महायुतीमध्ये तीन पैकी दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि निलेश राणे हे निवडून आल्यानंतर जिल्ह्यामध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघांमध्ये तीन-चार महिन्याच्या कालखंडामध्ये अतिशय जोमाने वाढताना दिसत आहे. त्याची प्रचिती म्हणून उद्याचा हा आभार मेळावा आहे. त्या मेळाव्याला सुद्धा शिवसेनेचे जिल्ह्यातील ताकद पाहायला मिळेल. या सभेला अनेक मंत्री, आमदार आणि संपर्कप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे सामंत म्हणाले.संजय आग्रे म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. त्यांच स्वागत भव्य दिव्य करण्याचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा मानस आहे. त्याच्यासाठी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि सर्व शिवसैनिक सज्ज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्यदिव्य असे त्यांचे स्वागत करायचे आहे आणि तसे नियोजन आम्ही केले आहे. एकनाथ शिंदे ज्या ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आलेत त्या ठिकाणी जाऊन ते मतदारांचे आभार मानतात त्याचप्रमाणे ते सिंधुदुर्गात येत आहेत. या सभेसाठी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर माजी मंत्री तसेच आमदार दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे असे अनेक मंत्री या दौऱ्यात येणार आहेत. कमीत कमी १५०० च्या आसपासचे पक्षप्रवेश यावेळी होतील. पण भाजपचे असतील ते शिवसेनेत येणार नाहीत आणि शिवसेनेचे असतील तर ते भाजपात जाणार नाहीत. आम्ही शंभर टक्के भाजपचे कोण पदाधिकारी किंवा कार्यकर्ते घेणार नाही, असे आग्रे यांनी स्पष्ट केले.