बीएसएनएल 'ब्रेकडाऊन नेटवर्कमुळे' सावंतवाडी येथील न्हावेली-सोनुर्ली परिसरातील ग्रामस्थांचे हाल.

सावंतवाडी.
मागील काही दिवासांपासून सावंतवाडी येथील न्हावेली,सोनुर्ली,आरोस पंचक्रोशीत बीएसएनएलच्या ब्रेकडाऊन नेटवर्कमुळे येथील जनतेचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करून देखील बीएसएनएल अधिकाऱ्यांचा यावर दुर्लक्ष होत आहे. या बाबतच्या तक्रारी न्हावेली रेवटेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेचे न्हावेली-मळेवाड विभाग समन्वयक संदेश सावंत यांच्याकडे रहिवाश्यांनी केल्या असून येत्या दोन दिवसात सदर गावात बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास न्हावेली,आरोस,सोनुर्ली गावातील ग्रामस्थांसहित बीएसएनएल जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे संदेश सावंत म्हणाले. पंचक्रोशीतील बीएसएनएल सेवा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थी व बीएसएनएल ग्राहकांचे हाल होत आहेत.आजही कित्येक युवक वर्क फ्रॉम होम करीत आहेत तर पुढे काही दिवसातच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत असून विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. बीएसएनएलच्या या अनागोंदी कारभारामुळे या विद्यार्थी वर्गाचे मोठ नुकसान होत असून याची जबाबदारी बीएसएनएल आपल्या डोक्यावर घेणार की रिचार्जच्या माध्यमातून फक्त पैसाच गोळा करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.