चिपळुणातील १६८ मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच; मतदान प्रक्रियेदरम्यानच्या हालचालींवर राहणार नजर.

रत्नागिरी.
लोकसभा निवडणुकीसाठी शांततापूर्ण आणि तणावमुक्त वातावरणात मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याबरोबर मतदान केंद्रावर कुठेही गोंधळ होऊ नये, पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया राबवली जावी, यासाठी चिपळूण तालुक्यात १६८ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर सीसीटीव्हीचा वाँच राहाणार आहे.
सद्या मतदानास केवळ काही दिवसांचा कालावधी शिलक असल्याने प्रशासकीय कामे युद्धपातळीवर सुरु आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर कोणत्याही बाबी ची कमतरता राहाणार नाही. याची प्रामुख्याने दक्षता घेतली जात आहे. वयोवृद्ध नागरिक, दिव्यांग बांधव हे अनेकदा मतदानासाठी बाहेर पडत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे त्यांना घरबसल्या मतदान करता - यावे, याची दक्षता या लोकसभा निवडणुकीत प्रथमच घेतली जात आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यात 'होम व्होटींग' बाबत दिव्यांग आणि ८५ वर्षावरील नागरिकांना सुलभरित्या मतदान करता यावे, याची दक्षता घेण्यात आली आहे.
त्यासाठी प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर पाच, सहा अधिकाऱ्यांची टिम तयार करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देखिल देण्यात येत आहे. यामुळे दिव्यांग व वयोवृद्धांना या निवडणुकीत घरबसल्या मतदान करण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर विद्युत व्यवस्था, स्वच्छ शौचालय, कर्मचारी निवास व्यवस्था, पाणी, व्हिलचेअर, सुस्थितीत इमारती आदी बाबींची पूर्तता करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात आला. निवडणूक आयोगाकडून यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. यापूर्वी क्वचितच सीसीटिव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था होती. मात्र सध्या तब्बल १६८ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
खेर्डी मंडळात १६ मतदान केंद्रावर सीसीटिव्हीची नजर असेल, याशिवाय, वालोपे, कळबंस्ते, पेढे, परशुराम, दळवटणे, चिंचघरी, आदी १६८ मतदान केंद्रावर अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसापासून सीसीटीव्ही बसवण्याचे काम तालुक्यात सुरू आहे. केंद्र अथवा राज्य सरकारच्या निवडणूक विभागाला थेट संबंधीत मतदान केंद्रावरील परिस्थितीची पाहाणी, अथवा आढावा थेटपणे घेता येणार आहे. येथील सहाय्यक निवडणूक अधिकारी आकाश लिगाडे यांनी आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बिनचूक मतदान प्रक्रिया पार पाडण्यावर भर दिला आहे, त्यासाठी सूक्ष्म नियोजनदेखिल केले जात आहे. सीसीटीव्ही मुळे मतदान केंद्रावरील प्रत्येक हालचालींवर नजर राहाणार असल्याने ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत होण्याची शक्यता आहे.