सिंधुदुर्गातील जमीन घोटाळ्यांच्या चौकशीसाठी एसआयटी......मनसेचे स्वागत पण पारदर्शकतेबाबत शंका
वेंगुर्ला
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडच्या काळात उघडकीस आलेल्या जमीन घोटाळ्यांची, बोगस शेतकरी दाखले जोडून केलेल्या बेकायदेशीर खरेदीखतांची आणि अकृषिक परवानग्यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. मात्र एसआयटी खरंच प्रामाणिकपणे काम करणार का, असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. पूर्वीचे अनुभव चांगले नसल्याने समितीच्या सदस्यांनी पारदर्शकपणे काम केल्यास जिल्ह्यातील अनेक जमीन घोटाळे उघडकीस येतील, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर म्हणाले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात जमीन खरेदी-विक्री करणारे दलाल तयार झाले असून या व्हाईट कॉलर दलालांनी गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने परप्रांतीय धनदांडग्या लोकांच्या घशात घातल्या आहेत, असा आरोप केसरकर यांनी केला. अनेक ठिकाणी महसूल यंत्रणेला हाताशी धरून बोगस शेतकरी दाखले जोडण्यात आले. वारस नोंद नसतानाही सामाईक जमिनींची खरेदीखते झाली. सातबारा वर मालकाचे नाव असूनही जमीन दुसऱ्याच्या ताब्यात असतानाही परस्पर व्यवहार झाल्याचे प्रकार घडले आहेत. अकृषिक परवानग्या देतानाही सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. सासोली, उभादांडा, वेंगुर्ला येथील शेतकऱ्यांचा लढा याचे जिवंत उदाहरण आहे.विधानसभेत या प्रकरणाचा आवाज उठवून सरकारला एसआयटी नेमण्यास भाग पाडल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे मनसेतर्फे आभार मानतो. जिल्ह्यात चौकशी समिती आल्यावर यापूर्वी झालेल्या सर्व जमीन घोटाळ्यांच्या स्वतंत्र फाईल्स समितीला देण्यात येतील. परप्रांतीय धनदांडग्यांनी नियम धाब्यावर बसवून महसूल व नोंदणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेल्या सर्व व्यवहारांची कागदपत्रे सोपवून संपूर्ण चौकशी अतिशय पारदर्शकपणे करण्याची मागणी केली जाईल, असे ॲड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले.
konkansamwad 
