महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्भिड नेतृत्व नामदार नीतेश राणे वाढदिवस विशेष

महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्भिड नेतृत्व नामदार नीतेश राणे वाढदिवस विशेष

    महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कणकवली मतदारसंघाचे आमदार तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे यांचा आज वाढदिवस. नितेश राणे हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर समाजासाठी झटणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठ आणि सहृदयता यांचा सुंदर संगम आहे. संकटसमयी धैर्याने निर्णय घेणे, समाजाच्या गरजा ओळखून योग्य दिशा देणे, आणि प्रत्येक माणसात सकारात्मकता जागवणा-या त्यांच्या गुणांमुळे ते सर्वांच्या मनात स्थान मिळवतात. सामाजिक कार्यात सातत्य, लोकांच्या अडचणींना समजून घेण्याची संवेदनशीलता आणि प्रगतीसाठी नवे उपक्रम राबवण्याची तयारी या सर्व गुणांमुळे नितेश राणे यांचे व्यक्तिमत्व सतत उन्नतीकडे वाटचाल करत आहे. नवीन संधी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी नेहमीच कौतुकास्पद  असते. त्यांच्या कर्तुत्वाचा वटवृक्ष त्यांना सावली आणि आधार देतो. नितेश राणे यांच्या नेतृत्वात समाजसेवेचे नवे  क्षितिज गाठले जात आहे. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात दरारा असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे खासदार नारायण राणे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपली वेगळी राजकीय ओळख निर्माण करणारे आमदार नितेश राणे यांनी आपल्या स्वभावामुळे अधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्येही आपली जरब बसविली आहे. वडिलांची ओळख घेऊन त्यांनी २००९ साली निवडणूक लढवली खरी मात्र २००९ पासून आता २०२५ पर्यंत एक महाराष्ट्रवादी राज्यस्तरीय नेता ही ओळख त्यांनी आपल्या कर्तृत्वाने निर्माण केली.सर्वसामान्य माणसांची कामे होताना कसूर झाल्यास त्याची दयामाया नितेश राणे करत नाही. मग तो कोणताही अधिकारी असो, विरोधी पक्षातला नेता असो किंवा आपलाच कार्यकर्ता असो.सर्वांना एकच न्याय. वडिलांसारखीच मनावर घेतलेली गोष्ट तडीस नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही त्यांच्या कामाची खासियत.कोकणवासीयांचा कोणताही प्रश्न असो, तो पोटतिडकीने आणि तेवढ्याच आक्रमकतेने सभागृहात मांडताना नितेश राणे सभागृह हलवून सोडतात.त्यांच्या या अभ्यासू वृत्तीचे अनेकदा मोठ्या नेत्यांकडून कौतुकही झालेय.कोकणचा कोणताही प्रश्न तडीस नेताना एक वेगळी तळमळ नितेश राणे यांच्यात कायमच दिसते.अस करीत असताना त्यांनी भल्याभल्यांना अंगावर घेतानाही मागे पुढे पाहिले नाही. कोकणवासीयांवर संकट आल्याचे कळल्यास तिथे पोहोचणारे आणि धीर देणारे पहिले नाव असते ते नितेश राणेंचे. संकट कोणतेही असो, आपला नेता या संकटाला पुरून उरणार हा दृढ विश्वास सामान्य कोकणी माणसात नितेश राणेंबद्दल दिसून येतो.असा विश्वास निर्माण करणे हे सहज वाटते तेवढे सोपे नाही आणि हा विश्वास एका दिवसात निर्माण झाला नाही. यासाठी पायाला भिंगरी लावून, जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढावा लागतो आणि सामान्यांच्या वेदना जाणून घ्याव्या लागतात. वडील नारायण राणेंच्या पावलावर पाऊल टाकत नितेश राणे अविरतपणे ते करीत असून आजही करताहेत. लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेले नारायण राणे यांच्या प्रचार कार्यात सिंहाचा वाटा आमदार नितेश राणे यांनी उचलला. यामुळे नारायण राणेंनी केलेल्या कामाचे आशीर्वाद नितेश राणेंना कोकणी जनता देतच आलीय. मात्र, त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी, तरुण आणि आबाल-वृद्ध यांच्या हृदयात आपलेपणा निर्माण करण्याची किमया नितेश राणेंनी साधलीय. एरवी कणखर, आक्रमक वाटणारा हा युवा नेता, सामान्य कोकणी माणसाच्या वेदना कळताच हळवा होतो. हे त्यांचे वेगळेपण अनेकांनी अनुभवलय. कोरोना काळात नितेश राणेंनी केलेले काम सरसच असल्याचे अनेकजण बोलूनही दाखवतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक युवा नेते कार्यरत आहेत. त्यात सर्वांचेच लक्ष वेधणारे नाव कोणाचे असेल तर ते नितेश राणेंचेच. त्याला कारणेही तशीच आहेत. आपल्या कर्तबगारीवर ज्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले, त्या आमदार नितेश राणे यांनी अल्पावधीतच आपल्या राजकीय वाटचालीने अवघ्या राज्याचे लक्ष वेधलेय.आज कोकणातले नव्हे तर राज्यातले तरुण नितेश राणेंकडे एक युवा नेतृत्व म्हणून आशेने पाहतात. विशेष म्हणजे त्यांच्या कामाला अभ्यासाची जोड असते. नितेश राणे यांची पार्श्वभूमी पाहता ते आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसतात. जसे नारायण राणे यांनी राजकारणात आपला आब राखला, मंत्री नितेश राणे देखील महाराष्ट्राच्या राजकारणात तसाच आपला दरारा ठेवून आहेत. नितेश राणे यांना पाहिल्यावर कार्यकर्त्यांना प्रति नारायण राणे असल्याचीच भावना निर्माण होते. सिंधुदुर्ग असो वा महाराष्ट्र आज नितेश राणे नाव हिंदुत्ववादी नेता म्हणून नावारूपास आलेले आहे. हिंदूंचे प्रश्न निर्भिडपणे मांडणारे राणे हे आजच्या घडीला एकमेव नेते आहेत. प्रसंगी यामुळे अनेक त्रास त्यांना सहन करावे लागले पण ते कधी डगमगले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नितेश राणे यांनी आपल्या खात्यामार्फत एक ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळवून देणे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो मच्छीमारांना कृषीसारख्याच अनेक योजनांचा फायदा मिळाला अशी अनेक प्रश्न तडीस नेताना एक वेगळी तळमळ नितेश राणे यांच्यात कायमच दिसते. एवढेच नव्हे तर  राजकीय गणिते मोठ्या शिताफीने सोडवण्याचे कसब नितेश राणेंकडे आहे. कुठे गुगली टाकायची, कुठे भेदक मारा करायचा आणि विरोधकांना क्लिन बोल्ड करायचे एवढी राजकीय मुत्सद्देगिरी राणे यांच्यात क्षणोक्षणी दिसून येते.जिल्ह्यात झालेल्या सर्वच निवडणुका खास असतात पण जिल्हा बँकेत नितेश राणेंची रणनीती हा राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. विरोधकांना योग्य वेळी सडेतोड उत्तर मात्र जनतेसाठी जनहिताची कोणतीही कृती करण्याची तयारी म्हणजे आमदार नितेश राणे यांचे राजकारण. अशा या कार्यतत्पर, निर्भिड, युवा लोकप्रतिनिधीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....