अमृत महाआवास अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक

कणकवली
"अमृत महाआवास" अभियान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.अमृत महाआवास अभियान 2022-23 या पुरस्काराचे वितरण दि. 3 जून रोजी बालेवाडी येथे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार. विभागीय स्तरावर कोकण विभागाने प्रथम क्रमांक पटकावला असून, जिल्हास्तरावर अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक सातारा व गोंदिया जिल्ह्याला मिळाला आहे. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला प्रथम क्रमांक मिळाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तर तृतीय क्रमांक सातारा जिल्ह्यातील जावळीला मिळाला आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने अमृत महा आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशभरातील राज्यांचा आढावा घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांनी या अभियानात उल्लेखनीय प्रगती केली आहे.