गॅस पाईपलाईनच्या नावाखाली रस्त्यांची चाळण...सर्वोदय नगरवासीय आक्रमक

गॅस पाईपलाईनच्या नावाखाली रस्त्यांची चाळण...सर्वोदय नगरवासीय आक्रमक

 

सावंतवाडी

 

     येथील सर्वोदय नगर परिसरातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्रस्त नागरिकांनी नगरपरिषदेवर धडक दिली. रस्ते, गटारे आणि गॅस पाईपलाईनच्या प्रलंबित कामांमुळे नागरिक हैराण झाले असून, येत्या ३० एप्रिलपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास १ मे ला महाराष्ट्र दिनी शांततामय मार्गाने लक्षवेधी उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत नागरिकांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले.सर्वोदय नगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणी आणि गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी वारंवार रस्ते खोदण्यात आले आहेत. काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी रस्त्यांची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरात खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना श्वसनाचे विकार आणि अॅलर्जीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्यावर्षीच दुरुस्त केलेले रस्ते पुन्हा खणून ठेवल्याबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.यावर बोलताना मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले की, रस्त्यांच्या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खडीकरणाचे काम हाती घेतले जाईल. नगरसेविका निलम नाईक यांनी यासंदर्भात नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्याशी चर्चा केली असून कामाच्या मंजुरीसाठी स्थायी समितीची बैठक तातडीने बोलावण्यात आल्याची माहिती दिली.रस्त्यांसोबतच परिसरातील गटारांमध्ये माती आणि कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाहीये. यामुळे दुर्गंधी पसरली असून पावसाळ्यापूर्वी याची स्वच्छता न झाल्यास आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. तसेच विजेच्या आणि इंटरनेटच्या तारांचे अस्ताव्यस्त जाळे आणि अयोग्य स्पीड ब्रेकरमुळे अपघाताचा धोका वाढल्याचेही निदर्शनास आणून दिले.यावेळी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या कारभारावरही जोरदार टीका करण्यात आली. गॅस बिलाबाबत कंपनीकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. याच गोंधळाचा फायदा घेत एका महिलेला गॅस कंपनीच्या नावे 'फ्रॉड कॉल' आला आणि तिची लाखो रुपयांची फसवणूक झाली. या घटनेची गंभीर दखल घेत नगरसेविका निलम नाईक यांनी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलेच झापले. शहरात सर्वात आधी सेवा सर्वोदय नगरमध्ये सुरू झाली असताना अद्याप पेमेंटची माहिती का दिली नाही, असा सवाल करत त्यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या शिष्टमंडळात गुरूदत्त कामत, दिक्षा कामत, कविता नाईक, मेघना राऊळ, शरयू बार्देसकर, संभाजी नाईक, सिद्धेश नेरूरकर, योगेश कुलकर्णी, गुंडू साटेलकर यांच्यासह सर्वोदय नगरमधील महिला कमिटी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.