तरुणांनी कोकणचे नाव जगभरात करावे - खासदार नारायण राणे........देवरुख येथे राणेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

देवरुख
कोकणातील तरुणांनी चांगले दर्जेदार शिक्षण घेऊन नोकरी व उद्योगाद्वारे कोकणचे नाव राज्य, देश आणि जगभरात करावे. येथील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे तरच कोकण खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी देवरुख येथील कार्यक्रमात केले.या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, सौ. नीलमताई राणे, आमदार नीलेश राणे, माजी आमदार सुभाष बने, सदानंद चव्हाण, राजेंद्र महाडिक, रोहन बने, दिलीप सावंत, भाजपचे प्रमोद अधटराव, मुकुंद जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, तहसीलदार अमृता साबळे, केदार साठे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. शहरातील मराठा भवन या ठिकाणी भाजपच्या वतीने खासदार नारायण राणे यांचा अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राणे यांनी कोकण विकसित करत असताना येथील जनतेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रत्नागिरीकरांनो वाटचाल करा. यासाठी येथील नेत्यांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी, आगामी मोठ्या प्रकल्पासाठी हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. यासाठी आवश्यक शिक्षण संस्था उभ्या राहायला पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. देशाचा विचार करता केवळ 14 टक्के महिला उद्योजक दिसून येतात. येथील महिलांनीही उद्योग व्यवसायमध्ये उतरले पाहिजे असे त्यांनी सांगितले. देशामध्ये केवळ एक टक्का मारवाडी समाज आहे. हा समाज अत्यंत कष्ट करून श्रीमंत बनवला आहे. श्रीमंताच्या यादीमध्ये देशात हा समाज 23% दिसून येत आहे. कोणतेही काम प्रामाणिकपणे केल्यावर यश नक्कीच मिळते.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे विधारक दृश्य दिसून येत आहे. चरस, गांजा याची विक्री कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. नाहीतर येथील तरुण बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले.वयाच्या पंधराव्या वर्षी राजकारणात आलो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचा आशीर्वाद व सहवास लाभला. यामुळेच राजकारणात आपण विविध पदांवर काम करत राहिलो.राजकारणात काम करत असताना 11 पदे आपण भूषवली असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे काम आपण करू शकलो यामुळेच मोठमोठी पदे भूषवता आली. आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. याबद्दल व जनतेने आपल्यावर केलेल्या अपार प्रेमाबद्दल आभार मानताना आपल्याकडे शब्द कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमप्रसंगी राणे यांना 73 दिव्यांचे औक्षण उपस्थित महिला वर्गाकडून करण्यात आले असून केक कापून वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राणे म्हणजे संघर्ष अशी व्याख्याच आहे. त्यांनी राजकारणात संघर्ष करतच आपली तत्त्व सांभाळून वाटचाल केली. बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर धडाकेबाज मुख्यमंत्री म्हणून काम करणारे राणेंचेच नाव आदराने घेतले जाते. विरोधकांना देखील आपलेसे करणारे नारायण राणे मन प्रेमळ असल्याचे आपल्याला अनेक वेळा जाणून आले असे सांगितले. त्यांच्याप्रमाणेच केवळ आपण दहा टक्के वागलो तरीही पक्ष संघटना समन्वयाने मजबूत करू शकतो असे मत उदय सामंत यांनी व्यक्त करून कोकणातील तरुण-तरुणींना याच ठिकाणी चांगल्या नोकरी निर्माण करण्यासाठी मोठमोठे उद्योग आणत असल्याचे त्यांनी सांगितले.येणाऱ्या उद्योगामुळे सुमारे 35 हजार तरुणांना रोजगार मिळवून जिल्ह्याची विकासात्मक गती वाढणार असल्याचेही सांगितले. यासाठीच महायुतीने हे उद्योग लवकर सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करुया असे नमूद केले. वाढदिवसानिमित्त त्यांच्या मनात असलेल्या विकासात्मक इच्छा पूर्ण होवोत अशी प्रार्थना नामदार सामंत यांनी केली. यावेळी चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी राणे यांचा संपूर्ण राज्यातील असलेला धबधबा, तसेच अधिकारी वर्गावर असलेली वचक याबाबत विवेचन केले.राणे यांनी चांगले विचार घेऊन राजकारणात राहून गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यावर कायमच भर दिला आहे. हेच बाळकडू त्यांच्या दोन्हीही मुलांना मिळाल्यामुळे नितेश राणे व निलेश राणे हे दोन्हीही राजकारणामध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे नेते ठरले. डिसिप्लेन आमदार म्हणून आम्ही निलेश राणे यांच्याकडे पाहतो असे यावेळी सांगितले. राजकारणात वावरत असताना मुले राजकारणात नावलौकिक मिळवणारी जन्मणे ही मोठी कमाई असते, हा आनंद राणे यांना मिळाला आहे अशा भावना आमदार निकम यांनी व्यक्त केल्या.माजी आमदार प्रमोद जठार यांनी राणे यांच्या 55 वर्षांच्या राजकीय प्रवासाचा आढावा सर्वांसमोर ठेवला. कोकणचा बुलंद आवाज ते असून त्यांच्यामुळेच कोकणाची वेगळी ओळख निर्माण झाली असून राजकारणातील सर्वांना मोटिवेशन देणार व्यक्तिमत्व आहे असे सांगून पुढील काळात कोकणातून नोकरी व्यवसायासाठी तरुणांचे होणारे मोठ्या शहराकडील स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी मागणी केली. कार्यक्रमात साहस प्रकल्प, राजू काकडे हेल्प अकॅडमी, गणेश वेदपाठ शाळा या संस्थांचा व तालुक्यातील आदर्श ठरलेले सरपंच, साडवली उपसरपंच अभिजीत सप्प्रे व कलाकार विलास रहाटे यांचा सन्मान नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात भाजपाच्यावतीने राणे यांना मोठा पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खासदार राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार निलेश भुरवणे यांनी मानले.