कलमठ पेन्शनर्स भवन येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कणकवली
सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर इतरत्र ज्ञान अवगत केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपली ज्ञानकक्षा वाढवली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यश हे नशिबाच्या जोरावर मिळत नाही, तर यश मिळविण्यासाठी मेहनत व प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचे मोबाईल व इंटरनेट हे नवे सवंगडी झाले आहेत, या सवंगडींचा वापर टाईमपास, मनोरंजनासाठी न करता आपली ज्ञान कक्षा वाढवण्यासाठी केला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हयातील विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष शरद कांबळी यांनी केले.ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखा, पेन्शनर्स असोसिएशनच्या कणकवली शाखा, ज्येष्ठ नागरिक सेवा संघच्या कणकवली शाखेच्यावतीने कलमठ येथील पेन्शनर्स भवन येथे दहावी व बारावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी कांबळी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कणकवली शाखेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, कणकवली तालुका पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हा सचिव सखाराम सपकाळ, ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षा श्रद्धा कदम, सचिव पूजा सावंत, पेन्शनर्स संघटनेचे सरचिटणीस उदय कुडाळकर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष सुरेश कोरगावकर, ग्राहक पंचायत कणकवली शाखेच्या उपाध्यक्षा गितांजली कामत, सहसचिव विनायक पाताडे, सुभाष राणे, विलास चव्हाण, राजस रेगे, प्रकाश वाळके, रश्मी माणगांवकर, श्री. भोजे, श्री. वंजारी, श्री. पाटकर, श्री. दळवी, सिद्धार्थ तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. कांबळी म्हणाले, ग्राहक पंचायत, पेन्शनर्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्यावतीने तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गौरव करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. श्रीमंत, अधिकारी, उद्योजक यांची मुले स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन ही मुले आयएएस, आयपीएस अधिकारी होतात. त्यांची ही मक्तेदारी जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी मोडून त्यांनी आयएएस, आयपीएस अधिकारी झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मनोहर पालयेकर यांनी मनोगत व्यक्त केले. दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विधी चिंदरकर, ध्रुव तेंडुलकर, नक्षा काळे, तृतीय अर्थव कोचरेकर, तर बारावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या तन्मय सावंत, शर्वरी आजगेकर, तृतीय तन्वी आरेकर यांचा व त्यांचा पालकांचा तिन्ही संघटनांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून ध्रुव तेंडुलकर तर पालकांमधून वीरेंद्र चिंदरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ग्राहक पंचायतीच्या संघटक रिमा भोसले यांनी केले व आभार दादा कुडतरकर यांनी मानले. यावेळी तिन्ही संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.