राज्यात अवकाळीचे संकट कायम: पुढील २४ तास गारपिटीचा इशारा, बळीराजा पुन्हा चिंतेत!

राज्यात अवकाळीचे संकट कायम: पुढील २४ तास गारपिटीचा इशारा, बळीराजा पुन्हा चिंतेत!

 

पुणे

 

    राज्यातील हवामानात सध्या कमालीची अस्थिरता निर्माण झाली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांसाठी पावसासह गारपिटीचा अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. 'कधी उन्हाचा चटका तर कधी जोरदार पाऊस' अशा दुहेरी हवामानाचा फटका महाराष्ट्राला बसत असून, २० मार्च २०२६ पर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि जालना या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसासोबतच ताशी वेगाने वाहणारे वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे. अकोला येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, मालेगाव, वाशिम आणि सोलापूरमध्ये पारा ४० अंशांच्या पार गेला आहे. धुळ्यातही तापमान ३९ अंशांच्या पुढे सरकले आहे. नाशिकमधील निफाड येथे १३.३ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पिके लवकर तयार होत आहेत, मात्र त्याचा विपरित परिणाम बाजारभावावर झाला आहे. उष्णतेमुळे टोमॅटो लवकर पिकत असल्याने बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवड्यात २२ किलोच्या क्रेटला ३५० रुपये भाव मिळत होता, तो आता थेट १५० रुपयांवर खाली आला आहे. शेतकऱ्यांना सध्या प्रति किलो केवळ ७ ते ८ रुपये दराने टोमॅटो विकावे लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.