महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा विजय !.....गणेशोत्सवावर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्तम सन्मान
नवी दिल्ली
देशाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात 'गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने राज्यांच्या गटात सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील विजेत्यांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सैन्यदल गटात, संस्कृती मंत्रालयाला 'वंदे मातरम्' या संकल्पनेवरील नृत्याविष्कारासाठी, तर आसाम रेजिमेंट आणि गुजरातच्या चित्ररथाला सार्वजनिक पसंतीच्या गटात प्रथम पुरस्कार मिळाले. नॅशनल स्टेडियममध्ये आयोजित समारंभात विजेत्यांचा सन्मान केला जाईल.राज्यांच्या महाराष्ट्रापाठोपाठ जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. गटात महाराष्ट्राच्या चित्ररथात गणेशोत्सवातील आधुनिकता आणि परंपरेने दर्शन घडले व याद्वारे आत्मनिर्भरतेचाही संदेश देण्यात आला. पारंपरिक पोशाखातील महिलांचे लेझीम नृत्य आणि 'गणपतीबाप्पा मोरया'च्या घोषाने कर्तव्यपथावरील जनसमुदायाने मोठी दाद दिली. नौदलाने तिन्ही सशस्त्र दलांमध्ये सर्वोत्कृष्ट संचलनासाठीचा पुरस्कार जिंकला. या पथकातील १४४ नौसैनिकांनी तडफदार माचिंग केले. याद्वारे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्यांचेही दर्शन घडले. दिल्ली पोलिस दलाला सर्वोत्तम पथकाचे पारितोषिक जाहीर झाले.संस्कृती मंत्रालयाच्या चित्ररथात बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या 'वंदे मातरम्' गीताच्या १५० वर्षांच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधले होते. 'वंदे मातरम्'चे १९२८ मधील एक दुर्मीळ ध्वनिमुद्रण व जुन्या परंपरा आणि 'जेन-झी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीचेही दर्शन घडवण्यात आले. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला (सीपीडब्ल्यूडी) फुलांची सजावट असलेल्या चित्ररथासाठी विशेष पुरस्कार मिळाला
दरम्यान, या वर्षीच्या संचलनात लोककला, तंत्रज्ञान आणि सामाजिक संदेश यांचा प्रभावी संगम दिसून आला. विविध चित्ररथांच्या सादरीकरणामुळे कर्तव्यपथावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आत्मनिर्भर भारत, सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याचे आयोजकांनी सांगितले.

konkansamwad 
