सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका.....शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका.....शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

सिंधुदुर्गनगरी

 

        सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक उत्पन्न असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला आहे या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष  मनीष दळवी, वेंगुर्ला माजी पंचायत समिती सभापती जयप्रकाश चमणकर, वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष संदेश निकम, प्रकाश बोवलेकर, श्यामसुंदर राय यांच्यासह वेंगुर्ला तालुक्यातील इतर प्रतिष्टीत व्यापारी व बागायतदार यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सविस्तर निवेदन सादर करून या संकटाकडे लक्ष वेधले. या निवेदनात अचानक झालेल्या हवामानातील बदल व अवकाळी पाऊस यामुळे सध्या झाडांवर काही प्रमाणात शिल्लक असलेली फळे गळून पडणार असून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार असल्याचे नमूद केले आहे तसेच याबाबत पालकमंत्री यांनादेखील निवेदन दिले असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. 23 तारीख पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून, बदललेल्या वातावरणाबाबत व झालेल्या अवकाळी पावसाबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा व ज्या शेतकऱ्यांची पीकपाणी नोंद ऑनलाईन झालेली नाही त्यांची ऑफलाइन नोंद करण्याबाबत तलाठ्यांना त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने या निवेदनाची दखल घेतल्यास फळ बागायतदारांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.