नांदगाव तिठा परिसरात स्वच्छतेचा जागर; मिशन सिंधुदुर्ग'च्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली
‘स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग' आणि नांदगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज नांदगाव तिठा बाजारपेठ परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून व्यापारी, ग्रामस्थ आणि प्रवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत परिसरात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष श्रमदान करून आपला सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिशन सिंधुदुर्गचे मुख्य स्वच्छता दूत पत्रकार गणेश जेठे यांनी प्रास्ताविकातून या मोहिमेचा उद्देश स्पष्ट केला. राष्ट्रगीताने मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी बाजारपेठ आणि तिष्ठ्ठा परिसरातील कचरा गोळा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांनी स्वच्छता मिशनच्या कामाचे कौतुक करत हा उपक्रम समाजाला योग्य दिशा देणारा असल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांनी भविष्यातील प्लास्टिकच्या धोक्याबद्दल सावध करत, प्रत्येकाने स्वच्छतेची शिस्त लावून घेणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.नांदगावचे सरपंच रविराज मोरजकर यांनी या मोहिमेचे स्वागत करताना सांगितले की, जसे आपण निवडणुकीसाठी घरोघरी फिरतो, तसेच स्वच्छतेचा संदेश घेऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे. गाव स्वच्छ ठेवून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या पातळीवर नांदगावचे नाव मोठे करावे, असे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेचे कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनीही दूरध्वनीवरून संवाद साधत केले.या मोहिमेत वैभववाडीचे नायब तहसीलदार दिलीप पाटील, माजी सभापती नागेश मोरये, माजी सरपंच पंढरीनाथ वायंगणकर, डॉ. वर्षा मगदूम, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेंद्र वायंगणकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्वच्छता दूत मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिमेदरम्यान व्यापाऱ्यांना स्वच्छतेचे संदेश देणारी पत्रके वाटण्यात आली.

konkansamwad 
